राज्य मंत्रिमंडळात आज तिघेच, विस्तार पुढील आठवड्यात

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी राज्याचे नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. आज आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली असून उर्वरित मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता पुढील आठवड्याची वाट पहावी लागणार आहे .
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी रखडला होता. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात असतील किंवा नाही याबाबत स्पष्टता झालेली नव्हती, मात्र अखेर चारच्या नंतर शिवसेनेचे दोन नेते सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होतील याबाबत त्यांना आश्वस्त केले. त्यासोबतच राज्यपाल महोदयांच्या कार्यालयात जाऊन देखील एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे पत्र त्यांना सादर करण्यात आले. यानंतरच सायंकाळी साडेपाच वाजता आधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे अशी अपेक्षा कालच देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्या दृष्टीने त्यांनी वर्षा या निवासस्थानी शिंदे यांची काल सायंकाळी देखील भेट घेतली होती. मात्र आज सायंकाळपर्यंत शिंदे यांच्या सहभागाबद्दल अनिश्चितता होती. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे अशी त्यांना गळ घातली, अन्यथा आम्ही मंत्री पदाची शपथ घेणार नाही अशी भूमिका देखील जाहीर केली यानंतर शिंदे यांनी आपली भूमिका मवाळ करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आपली संमती दर्शवली.
एकनाथ शिंदे यांना गृह खाते हवे होते त्यासाठी ते अडून बसले होते, मात्र प्रत्यक्षात माध्यमांच्या समोर त्यांनी आपल्यामुळे कोणतेही काम अडलेले नाही, आपण खुल्या दिलाने सरकारमध्ये सहभागी होत आहोत अशीच भूमिका मांडली होती. मात्र पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात , त्यानुसार त्यांना गृहमंत्री पदाची अपेक्षा होती. भाजपाने शेवटपर्यंत गृहमंत्री पद देण्यास नकार दिला. अखेर आज सायंकाळी उशिरा नगर विकास खात्यासोबतच महसूल खातेही पदरात पाडून घेण्यात शिंदे यशस्वी झाल्याचे समजले आहे .त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी संमती दर्शवल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अजित पवार यांना अर्थ खाते मिळणार असून गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार आहेत.
आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्री आणि नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आजच्या या सोहळ्यात या तिघांखेरीस अन्य कोणताही शपथविधी झाला नाही, त्यामुळे राज्याचे सध्याचे मंत्रिमंडळ हे केवळ तिघांचे असून मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 11 तारखेला होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आता पुढील आठवड्याची वाट पहावी लागणार आहे.