शत प्रतिशत साठी आता भाजपचाच मुख्यमंत्री , फडणविसांचे नाव निश्चित !

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट समाविष्ट झाल्याने या निवडणुकीमध्ये पक्षाची तिकिटे न मिळणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी खुद्द अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये 2029 मध्ये शतप्रतिशत भाजपा असा नारा दिला होता. तो नारा पूर्ण करण्यासाठी आत्ताच्या निवडणुकीत तब्बल 132 जागा मिळालेल्या भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असे आता जवळपास निश्चित झाले असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीच निश्चिती झाल्याचे विश्वसनीय रित्या समजते आहे.
महायुतीचे जागावाटप करताना ज्या जागा 2014 आणि 2019 या निवडणुकीत भाजपाने लढविल्या होत्या, त्यातल्या अनेक जागा यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोडाव्या लागल्या होत्या. त्या ठिकाणी वर्षानुवर्षे लढत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांची नाराजी थोपविण्यासाठी अमित शहा यांनी विभागवार बैठका घेतल्या होत्या , त्यात आत्ता सांभाळून घ्या 2029 मध्ये शतप्रतिशत भाजपाचेच उमेदवार असतील असे त्यांना आश्वासित केले होते. आता तब्बल 132 जागा मिळाल्यानंतर हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सोबतच भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातही भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा असा जोरदार आग्रह आहे. त्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित झाले आहे .
2019 च्या निवडणुकीत तत्कालीन एकत्रित शिवसेनेसोबत युती युती केल्यानंतर जनादेश युतीच्या बाजूने लागलेला असतानाही शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजपाच्या आकांक्षांवर पाणी फिरले होते. मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची घोषणा देखील हवेतच विरली होती, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाने प्रचंड प्रमाणात दुखावलेल्या भाजपाच्या वर्तुळात ठाकरे यांना धडा शिकवण्यात आला आणि शिंदे यांच्या शिवसेनेला कमी जागा असतानाही मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बहाल करण्यात आले, मात्र वारंवार असा त्याग करणे पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळेच आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची कितीही इच्छा असली तरी ते पद भाजपाकडेच राहील याबद्दल शंका राहिलेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांना काल दिल्लीत पाचारण करण्यात आले होते त्यावेळी त्यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याचे समजते आहे आणि त्यांनाच मुख्यमंत्री पद देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे मात्र भाजपाचे धक्का तंत्र अवगत असणाऱ्या अनेक जाणकारांना शेवटच्या क्षणी देखील वेगळेच नाव पुढे येऊ शकते असे वाटत आहे. तरीही सध्या तरी फडणवीस यांना पर्याय नाही असे भाजपाच्या अंतर्गत वर्तुळात बोलले जात आहे .
एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्री पद अथवा राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले आहे मात्र त्याला सध्या तरी शिंदे तयार नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे त्यांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची पसंती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळेच शिंदे यांना फार काळ नाराज राहता येणार नाही. याशिवाय केंद्रामध्ये महाशक्ती असल्याचे त्यांनीच आपल्या आमदारांच्या बैठकीत वारंवार स्पष्ट केलेले आहे, त्यामुळे आता त्या महाशक्तीचे ऐकावेच लागेल अशी परिस्थिती आहे. त्या बदल्यात काही वजनदार खाती आपल्या पदरात पाडून घेता येतात का आणि जमलेच तर केंद्रात आणखी एक मंत्री पद मिळू शकते का? याची चाचणी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीत असल्याचे बोलले जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक अद्याप झालेली नाही. ती येत्या एक-दोन दिवसात होणे अपेक्षित आहे. त्यातच दिल्लीहून निश्चित झालेले गटनेत्याचे नाव जाहीर होईल आणि त्यानंतर महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून हा नेता शपथ घेईल. यादरम्यानच्या काळात कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिल्लीला पाचारण करण्यात येईल आणि त्यांच्याशी मंत्रिमंडळाच्या स्वरूपाबाबत चर्चाही करण्यात येईल असे समजते. सध्या तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हा सस्पेन्स अद्यापी कायम आहे.