जागतिक महिला हिंसाचार मुक्ती जागृती दिन : महिलांना दुर्बल, दुय्यम समजणारी हिंसक वृत्ती दूर करायला हवी

 जागतिक महिला हिंसाचार मुक्ती जागृती दिन : महिलांना दुर्बल, दुय्यम समजणारी हिंसक वृत्ती दूर करायला हवी

मुंबई, दि. 25 (राधिका अघोर) : जगभर महिलांवर होणारे अत्याचार, विशेषतः हिंसक कृती थांबवल्या जाव्यात, महिलांना निर्भयतेने जगात कुठेही वावरता येईल अशी व्यवस्था निर्माण करता यावी, या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यासाठी 25 नोव्हेंबर हा दिन आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.

जग अत्यंत प्रगत, सुसंस्कृत होण्याकडे वाटचाल करत असले, तरीही त्यासोबत, जगण्याच्या, अस्तित्वाच्या स्पर्धाही जीवघेण्या होत चाललेल्या आहेत. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अस्थिर, अस्वस्थ जगात हिंसाचार कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. जिथे हिंसाचार, अत्याचार होतात, तिथे पहिला बळी महिला आणि दुर्बल घटकांचाच जातो. पुरुषी मानसिकतेची वृत्ती असो, दमनकारी समाज असो, दोन देशातील युद्ध असो, किंवा दोन समाजातील वितुष्ट, अशा प्रत्येक वेळी शारीरिक अत्याचार, हिंसा याचा बळी महिला ठरतात. आजही यात फारसा बदल झालेला नाही.
आजही आकडेवारी सांगते, की दर 10 मिनिटांना जगात कुठेतरी एक स्त्री मारली जाते, तिच्यावर अत्याचार होतो.

महिलांवर, मुली-बलिकांवर होणारे अत्याचार, मानवाधिकारांच्या कक्षेतले सर्वात क्रूर अत्याचार मानले जातात. आजही, तीनपैकी एक महिला शारीरिक/लैंगिक किंवा मानसिक आत्याचाराची बळी ठरते, तिच्या आयुष्यात किमान एकदा केव्हातरी, तिला अशा अत्याचाराचा सामना करावा लागतो, असं आकडेवारी सांगते. यातून, या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.

याचाच विचार करून, यंदाच्या महिला हिंसाचार विरोधी दिनाची संकल्पना आहे, #NoExcuse
UNiTE to End Violence against Women. म्हणजेच, “महिलांविरोधातील हिंसाचार संपवण्यासाठी एकत्रित व्हा, आता काहीही कारणे देऊ नका.” यासाठी एक विशेष जनजागृतीपर मोहीम राबवली जात आहे. आजपासून म्हणजेच, 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर- म्हणजेच जागतिक मानवाधिकार दिन या 16 दिवसांच्या कालावधीत महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

यात महिलांवर हिंसाचार होण्याची कारणे शोधून त्यांना आळा घालण्यासाठी काम करणे, कामाच्या ठिकाणी, किंवा घरगुती हिंसाचाराच्या घटना घडल्यावर, त्यांची तक्रार नोंदवली जाऊन कारवाई होईल, याची दक्षता घेणे, महिलांना त्याविषयी जागृत करणे, आधार देणे अशा उपक्रमांचा समावेश आहे.
महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी, त्यांना संरक्षण देणारे कायदे आहेत का? तर अत्यंत उत्तम कायदे आहेत. भारतापुरते बोलायचे झाल्यास, आज महिलांच्या संरक्षणासाठी 42 कायदे अस्तित्वात आहेत. अर्थात, अनेक कायदे, एखादा अत्याचार झाल्यानंतर, त्यावर मोर्चे, आंदोलन झाल्यानंतर निर्माण झाले आहेत, ही गोष्ट वेगळी.

त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, निर्भया कायदा. आता सुधारित न्याय संहितेनुसार, ह्या कायद्यातल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
कायदे आहेत, तरीही, अत्याचार, हिंसाचार कमी का होत नाहीत, याचा विचार करण्याची गरज आहे. यामागची कारणे म्हणजे अत्यंत पीडित, दुर्बल समाजातल्या महिला, यांच्यापर्यंत हे कायदे किंवा कायदेशीर मदत पोहोचतच नाही. किचकट आणि खर्चीक कायदेशीर प्रक्रियेत अडकण्यापेक्षा, त्या अनेकदा हिंसा, अत्याचार सहन करत राहतात. अनेकदा ओळखीच्या किंवा घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिला, लहान मुली, या गोष्टी सांगत नाहीत, कुटुंबातले लोक अशा गोष्टी उघड होऊ देत नाहीत, घराच्या प्रतिष्ठेचा वगैरे विचार करून, अशी प्रकरणं दाबून टाकण्याकडे त्यांचा कल असतो. यातून असे गुन्हे करणाऱ्यांचा धीर चेपतो, आणि ते पुढे आणखी गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त होतात.

अनेकदा अब्रू वगैरे गोष्टींची भीती महिलांना दाखवली जाते, त्यामुळे त्या पुढे येत नाहीत. अशा सगळ्या गोष्टीमुळे हे छोटे मोठे अत्याचार होतच राहतात, त्यांची नोंद होत नाही. मात्र अत्याचार करणारा, आपण असे प्रकार करून सुटू शकतो, अशा भ्रमात राहतो आणि एकदिवस मोठा गुन्हा करतो.
दुसरे कारण असते, कायद्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अत्यंत त्रासदायक असणे. ही प्रक्रिया जितकी जलद, सुलभ आणि सकारात्मक असेल, पीडितेचा विचार करणारी असेल, तितका महिलांचा कायद्यावरील विश्वास वाढत जाईल. त्यादृष्टीने काम करणाऱ्या अनेक महिला संघटना आहेत, ज्यांची मदत महिलांना व्हायला हवी.

आपल्याकडे, एखादी घटना उघड झाली, की त्याचा मोठा उद्रेक होतो, अनेकदा राजकीय फायद्यासाठी अशा घटनांचा एक हत्यार म्हणून वापर केला जातो, आणि परस्पर आरोप केले जातात. जनतेचा उद्रेक बघून, तेव्हा आरोपीला पकडले जाते आणि कारवाई वेगाने होईल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र, मिडियाला रोज नवे खाद्य हवे असते, त्यामुळे मीडियाच्या चर्चेतून हा विषय बाजूला झाला, की लोकही विसरतात आणि मग कारवाई मागे पडते, आरोपीला जामीन मिळतो, विषय पोलिस आणि न्यायालयाच्या फायलीमध्ये अडकून पडतो. कित्येक गाजलेल्या प्रकरणांचा हाच शेवट झालेला आपल्याला बघता येईल. पुन्हा नवा हिंसाचार झाला की तेवढ्यापुरता उद्रेक !

हे थांबवायचं असेल, तर महिलांना भोगवस्तू, दुर्बल समजणारी वृत्ती, हिंसाचाराची वृत्ती आपल्याला समूळ नष्ट करावी लागेल. आपल्या मुलांना घडवतांना जाणीवपूर्वक त्यांच्यावर हे संस्कार बिंबवावे लागतील. आणि मुलीना वाढवतांना, त्या दुर्बल, अबला नाहीत हे त्यांना शिकवावे लागेल, त्यांना शारीरक दृष्ट्या सक्षम करावे लागेल. आत्मसंरक्षणासाठीचे प्रशिक्षण द्यावे लागेल. अजून समान आणि सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी, आपल्याला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. मात्र, प्रत्येकाला एक पाऊल नक्कीच टाकता येईल.

ML/ML/PGB 25 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *