Hockey टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला.आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज धमाकेदार खेळ करत कोरियन संघाचा धुव्वा उडवला. भारताने हा सामना ४-१ ने जिंकला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. उपांत्य फेरीत चीनने पाकिस्तानचा पराभव केला होता.
टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने चौथा गोल केला. त्याचा हा सामन्यातील एकूण दुसरा गोल ठरला. त्याने भारताला ४-१ ने पुढे केले. ही गोलसंख्या सामना संपेपर्यंत कायम राहिली.
आजच्या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांनी गोल केले. भारताने सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फायनलमध्ये भारताचा सामना चीनशी होणार आहे. चीनने पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
हाफ टाइमपर्यंत टीम इंडियाकडे २-० अशी आघाडी होती. यानंतर जर्मनप्रीत सिंगने तिसरा गोल केला. त्याने कोरियन गोलकीपर किमला अजिबात हालचाल करण्यास वेळ दिला नाही. भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड प्रस्थापित केली होती. त्यानंतर कोरियाच्या यांग जी-हुनने उत्कृष्ट गोल नोंदवून आपल्या संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात कोरियासाठी गोल करणारा तो एकमेव खेळाडू होता.
SL/ ML/ SL
16 Sept 2024