‘शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी’

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘ शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
मुंबई येथे आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी आक्रमक झाली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कमिशनखोर आणि टक्केवारी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.
शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार धीर, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे,अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
ML/ML/SL
27 June 2024