शेतमाल निर्यातीत ८.८ टक्क्यांची घट

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूका डोळ्यासमोर ठेवून गत दोन वर्षांपासू बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने विविध कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे देशातील शेतमालाची निर्यात एप्रिल ते फेब्रुवारी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८.८ टक्क्यांनी घसरून ४३.७ अब्ज डॉलरवर आली आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणांसोबतच तांबड्या समुद्रातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाचा शेतमाल निर्यातील फटका बसला. तांदूळ, गहू, साखर आणि कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातलेली आहेत. त्याचा परिणाम शेतमालाच्या निर्यातीवर झाला आहे. त्याची झळ शेतकऱ्यांना बसली आहे. गहू, तांदूळ, साखर आणि कांदा निर्यातीवर निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना थेट फटका बसला. शेतकऱ्यांकडून निर्यात निर्बंध उठवण्यासाठी मागणी करण्यात येत होती. परंतु केंद्र सरकारने ग्राहक हितासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली. गहू, तांदूळ, साखर आणि कांदा निर्यातबंदीमुळे गेल्या आर्थिक वर्षात ५ ते ६ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे कृषी बाजारभाव तज्ज्ञांचे मत आहे. .
केंद्र सरकारकडून शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा दावा वाणिज्य मंत्रालयाकडून सातत्याने केला जातो.अपेडाच्या माध्यमातून ७१९ शेतमालाची निर्यात केली जाते. परंतु अपेडाची निर्यातसुद्धा एप्रिल-फेब्रुवारी २०२२-२३ मधील २४ अब्ज डॉलरच्या तुलनेत ६.८५ टक्क्यांनी घसरून २२.४ अब्ज डॉलरवर आली आहे. तर अपेडा निर्यात करत असलेल्या प्रमुख २४ मालापैकी १७ प्रकारच्या मालांची निर्यात काहीशी सुधारली आहे. त्यामध्ये ताजी फळे, म्हशीचं मांस, प्रक्रिया केलेल्या भाज्या, बासमती तांदूळ आणि केळीचा समावेश आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते फेब्रुवारी २०२२-२३ या आर्थिक वर्षात शेतमालाची निर्यात ४७.९ अब्ज डॉलरवर पोहचली होती. परंतु जागतिक स्तरावरील तणावाची स्थिती आणि केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणांमुळे निर्यातीचा टक्का घसरला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचा जीडीपी घटला आहे. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा जीडीपी ०.७ टक्क्यांनी वाढ दर्शवतो. परंतु २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राच्या जीडीपीत ४.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात निर्यातीत घसरण झाली आहे.
SL/ML/SL
23 April 2024