पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी वर काँग्रेस लढतेय ही निवडणूक

अमरावती, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला, युवा , किसान, श्रमिक आणि भागीदारी या पाच न्याय तसेच पंचवीस गॅरंटीच्या आधारावर कॉंग्रेस पार्टी ही निवडणूक लढवित आहे असे कॉंग्रेस पार्टी चे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले.
जयराम रमेश आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावती आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
2024 ची लोकसभा निवडणुक लोकतंत्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला वाचविण्यासाठी इंडिया गठबंधन लढत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात मध्य भारत,दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाचा सफाया होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती ही नगरी देशाचे माजी कृषिमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांची असून देशाच्या कृषी विकासात त्यांचे अमूल्य योगदान आहे. डॉ पंजाबराव देशमुख यांचाच आदर्श आमच्या समोर असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले.
कॉंग्रेस पार्टी ने जाहीर केलेले घोषणापत्र हे कॉंग्रेस सह इंडिया गठबंधन चे असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया गठबंधनची केंद्रात सत्ता आल्यास संविधान संशोधन करून SC, ST, OBC यांच्यासाठी असलेल्या 50 टक्के आरक्षणात वाढ करण्यात येणार असल्याचे जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार यशोमती ठाकूर,माजी आमदार विरेंद्र जगताप,कॉंग्रेस पार्टी चे मुख्य राज्य प्रवक्ता अतुल लोंढे इत्यादी उपस्थित होते.
ML/ML/SL
20 April 2024