स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी निवडणूक लढविण्यावर ठाम
कोल्हापूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवण्यावर ठाम आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असं परस्पर सांगितलं जातं होतं.आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. महायुतीची साथ ही आम्ही आधीच सोडलेली आहे, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
भाजपच्या विचारधारेला आम्ही उघड विरोध केला आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपनं केलं, असा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपनं शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले, हमीभाव कायदा आणला नाही.
दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं पण त्याकडे दुर्लक्ष केलं होतं, अशी टीकाही त्यांनी भारतीय जनता पक्षावर यावेळी केली. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं मात्र त्यावेळी विरोध न करता आता बोललं जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे, असा आरोपी त्यांनी यावेळी बोलताना केला.
महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा अशी विनंती केली. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो होतो. शिवसेना सोडून गेलेल्यांना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही उमेदवार देऊ नका असं मी बोललो. कारण शिवसेनेकडे त्या ताकदीचा उमेदवार नाही. मी मतदार संघात काम केलंय.
शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठींबा द्या असं मी म्हणालो.
मात्र शिवसेनेनं अचानक उमेदवार जाहीर केला. तो
जाहीर करण्याच्या आधी काही तास शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता.
मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली. मात्र मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला, असं राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात. त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
काही कारखानदारांना माझा काटा काढण्याची संधी मिळाली असं वाटतं असेल.
शिवसेनेला त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचं होता
आणि मला लोकसभा निवडून यायचं आहे. संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेनेचं काम करतील काय, असा सवाल शेट्टी यांनी केला
हातकणंगले मधील वंचित उमेदवार हे भाजपचे सक्रिय आहेत.आज देखील त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजिनामा वंचितच्या उमेदवारानं दिला नाही.त्यामुळे कुठून काय काय घडलं हे तुम्हाला माहिती झालं असेल, असं राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितलं. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा आहे की नाही हे चर्चा करून ठरवणार आहे. शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या भावना वेगळ्या आहेत. कारण शेतकऱ्यांचा प्रश्नावर शाहू महाराज यांनी नेहमी पाठींबा दिला आहे. महाविकास आघाडीनं माझ्या विरोधात उमेदवार दिला तरी कोल्हापूर बद्दल आम्ही विचार करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इचलकरंजी शहराच्या पाण्यासाठी मी कधीही विरोध केला नाही. पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं आरक्षण वेगळं असतं. मी पाणी द्यायला पाहिजे हे सांगायला गेलो होतो. त्या फोटोचा विपर्यास केला आणि मला बदमान केलं. विद्यमान खासदारांनी तर काहीच केलं नाही. इचलकरंजी शहराला लढा देऊन मीच पाणी देणार आहे, अशी ग्वाही पाणी प्रश्नासंदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी दिली Raju Shetty of Swabhimani Shetkar Sangathan insists on contesting elections
ML/ML/PGB
8 Apr 2024