केजरीवालांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यास न्यायालयाचा नकार, ED कोठडीत मात्र वाढ

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारू घोटाळ्या प्रकरणी ED च्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अटकेनंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. असे असले तरीही अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने वाढ केली आहे. दारू धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने नऊवेळा समन्स बजावलं होतं. त्यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं होतं. त्यानंतर २१ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली.
तुरुंगातून केजरीवाल यांना दिल्लीचं सरकार चालवता येणार नाही, अशी याचिका दाखल करण्यात आली होती, ही याचिका न्यालायनाने फेटाळून लावली आहे. असं कोणतंही घटनात्मक बंधन नाही की केजरीवाल या पदावर राहू शकत नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं आहे. कार्यपालिकेशी संबंधित हा प्रश्न असून न्यायालयाची यात कोणतीही भूमिका नाही. दिल्लीच्या राज्यपालांकडे हे प्रकरण आहे आणि तेच या प्रकरणाची सर्व माहिती राष्ट्रपतींना देतील, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. मुख्य प्रभारी न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.
दरम्यान गेल्या महिन्यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीकडून अटक होण्यापूर्वी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवला. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. ते तुरुंगातून दिल्लीचा कारभार करत आहेत. त्यामुळे न्याय यंत्रणे समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
SL/ML/SL
28 March 2024