माथाडी कामगारांचे साखळी उपोषण सुरू

मुंबई दि.19( एम एमसी न्यूज नेटवर्क) : कापड बाजारातील माथाडी – हातगाडी गरीब कष्टकरी कामगारांना कांदिवली – चारकोप सह्याद्री नगर येथील शासनाने दिलेल्या ७ एकर मोकळया भुखंडावर कापड बाजार आणि दुकाने मंडळ (बोर्ड) यांच्या माध्यमातून प्रचलीत पध्दतीने घरे बांधून देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या २० दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानात साखळी उपोषणाला बसले आहेत.
कापड बाजारात हमालीपासून इतर अनेक प्रकारची कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी
कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समिती गेली २० वर्ष संघर्ष करीत आहेत.याबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु निगरगट्ट प्रशासनाने या कामगारांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही.असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
कांदिवली – चारकोप सह्याद्री नगर येथील शासनाने दिलेल्या ७ एकर मोकळया भुखंडावर राज्य सरकारने बांधकाम सुरु करण्याचे आदेश दयावेत.या भूखंडावरील विकास आराखडयातील, इस्पितळ, मैदान, रस्ता इ. आरक्षण वगळणे.तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी हा भूखंड अपर आयुक्त, कोकण विभाग मुंबई यांच्या ३१ जानेवारी २०२३ च्या आदेशानुसार कापड बाजार आणि दुकाने मंडळाला कामगारांच्या घरबांधणीसाठी परत करावा तसेच बांधकामास मुदतवाढ द्यावी
अशी मागणी ही केली आहे.
ऍड .धर्मराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली संजय भोईटे,बाळासाहेब बोरगे, संजय चव्हाण,संतोष जगताप यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.गेली 20 दिवस राज्यातील रोज पाच माथाडी कामगार साखळी उपोषण करीत आहेत. शासनाने या सर्व प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा प्रश्न निकालात काढावा अन्यथा माथाडी कामगार
रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा या कामगारांनी दिला .
SW/ML/SL
19 March 2024