प्राप्तिकर विभागानं गोठवली काँग्रेसची बँक खाती

 प्राप्तिकर विभागानं गोठवली काँग्रेसची बँक खाती

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीत उतरण्यासाठी बलाढ्य भाजपला टक्कर देण्यासाठी राजकीय गणिते बांधण्यात व्यस्त असलेल्या काँग्रेस पक्षासमोर आता एक नवीन आव्हान उभे राहीले आहे.देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची बँक खाती प्राप्तिकर विभागानं गोठवली आहेत. काँग्रेस पक्षाचे खजिनदार अजय माकन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपा व प्राप्तिकर विभागावर गंभीर आरोप केले आहेत. “आमच्याकडे आता वीजबील भरण्यासाठीही पैसे नाहीत”, अशी उद्विग्न व्यथा अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

अजय माकन म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेले चेक पास केले जात नसून पक्षाला आलेले चेकही खात्यात जमा करण्यास बँका नकार देत आहेत. बँकांच्या या भूमिकेनंतर आम्ही केलेल्या चौकशीनुसार युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खातीही सील करण्यात आली आहेत. ‘निवडणूक घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हा लोकशाही गोठवण्याचा प्रकार आहे, असा घणाघात माकन यांनी केला. आयकर विभागानं युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला २१० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. क्राउडफंडिंगच्या माध्यमातून पक्षाला मिळालेला निधी गोठवण्यात आला आहे, असं माकन म्हणाले.

‘काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यासाठी देण्यात आलेलं कारणही हास्यास्पद आहे. २०१८-१९ च्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आज २०२४ सुरू आहे. आम्हाला रिटर्न फाइल करायला थोडा उशीर झाला म्हणून २१० कोटींची भरपाई मागण्यात आली आहे. कारवाईची वेळ पाहिली तर यामागचा हेतू सहज स्पष्ट होतो, असं माकन म्हणाले.’काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यात असलेला पैसा धनाढ्यांचा, उद्योगपतींचा नाही. हे सगळे पैसे पक्षाच्या सदस्य नोंदणीचे, ऑनलाइन पेमेंटद्वारे पक्षाला मिळालेले आहेत. शंभर, दोनशे रुपये लोकांनी यूपीआयच्या माध्यमातून जमा केलेले आहेत. लपूनछपून जमवलेला हा पैसा नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवलेल्या निवडणूक रोख्यातून जमवलेले हजारो कोटी भाजप खर्च करत आहे. कुठं राहिलीय देशात लोकशाही?,’ असा सवाल माकन यांनी केला.

माकन म्हणाले की, काँग्रेसने याप्रकरणी आयकर अपीलीय न्यायाधिकरणाकडे संपर्क साधला आहे. न्यायव्यवस्था लोकशाहीचे रक्षण करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भाजपवर आरोप करत काँग्रेस नेत्याने त्यांना देशात एकच पक्ष हवा आहे का, असा सवाल केला. ते म्हणाले की जर कोणाची खाती सील करायची असतील तर ती भारतीय जनता पक्षाची असावी कारण त्यांनी ‘असंवैधानिक’ इलेक्टोरल बाँडद्वारे कॉर्पोरेट जगताकडून पैसे घेतले आहेत.

SL/KA/SL

16 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *