रिलायन्स रिटेल आता मिठाई उद्योगात

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रावळगाव हा ऐशी ते नव्वदच्या दशकात लहानमुलांना आवडणाऱ्या टॉफी बनवणारा ब्रँण्ड म्हणून लोकप्रिय होता. रावळगाव टॉफीचे वाटप करून तेव्हा अनेकांचे वाढदिवसही साजरे झाले असतील. आता लहानमुलांसाठी खाऊ निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या गर्दीत आजही टिकाव धरून राहीलेली रावळगाव टॉफीची उत्पादक कंपनी रावळगाव शुगर फार्मचा मिठाई आता रिलायन्सच्या ताब्यात जाणार आहे. यामुळे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आजून एका कंपनीचे मालक होणार आहेत. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची एफएमसीजी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने रावळगाव शुगर फार्मचा मिठाई व्यवसाय खरेदी केला आहे. हा करार 27 कोटी रुपयांना झाला आहे. करारानुसार या कंपनीचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क आता रिलायन्सकडे आले आहेत.यामुळे रिलायन्स आता मिठाई उद्योगातही पाय रोवणार आहे.
रावळगाव यांनी शुक्रवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी 1933 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात साखर कारखान्याची स्थापना केली. 1942 मध्ये या कंपनीने रावळगाव ब्रँड अंतर्गत टॉफी बनवण्यास सुरुवात केली. या कंपनीचे पान पासंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक असे नऊ ब्रँड आहेत.
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स अधिग्रहण आणि भागीदारीद्वारे वेगाने विस्तारत आहे. रावळगावच्या अधिग्रहणामुळे एफएमसीजी पोर्टफोलिओचा विस्तार होईल. कंपनीमध्ये आधीच कॅम्पा, टॉफीमन आणि रस्किक सारख्या ब्रँडचा समावेश आहे. एफएमसीजी कंपन्यांमध्ये ग्राहक बाजारपेठेतील जास्तीत जास्त हिस्सा मिळविण्याची शर्यत सुरू आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते इतर कंपन्यांचे अधिग्रहण करत आहेत. मात्र, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने या कराराबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. संघटित आणि असंघटित उद्योगधंद्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे रावळगावचा बाजारपेठेतील हिस्सा कमी होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळेच कंपनीने आपला मिठाई व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला.
SL/KA/SL
10 Feb. 2024