येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह या राज्यांसाठी पावसाचा अलर्ट
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून भारताच्या ऋतूचक्रामध्ये प्रचंड बदल झाले आहेत.गेल्या ४ ते ५ वर्षांपासून हिवाळ्याच्या कालावधीत अवकाळी पाऊस होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रब्बी पिकांच्या या हंगामात पावसाची टांगती तलवार असल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. या वर्षी देखील अवकाळी पावसाची स्थिती निर्माण होण्यास अनुकुल वातावरण तयार झाले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था यांनी हा पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
अरबी समुद्रात कमी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. स्कायमेटने येत्या 48 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असल्याने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतात धुके आणि थंडीचा कडाका वाढला आहे.
महाराष्ट्रातील देखील गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. काही ठिकाणी दाट धुके पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि बरेलीमध्ये दृश्यमानता 25 मीटरपर्यंत कमी झाली आहे. उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान, बिहारमध्ये जास्त धुके आहे तर मध्य प्रदेश आणि त्रिपुरामध्ये दाट धुके आहे. जम्मू विभागात धुक्याची पातळी हलकी आहे. धुक्याचा रेल्वे वाहतुकीपासून ते हवाई सेवेपर्यंत सर्वच गोष्टींवर विपरित परिणाम झाला आहे. गुरुवारी अनेक गाड्या उशिराने धावत होत्या आणि उड्डाणे उशिराने सुरू होती. धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली आहे.
SL/KA/SL
4 Jan. 2024