जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर ब्राह्मण समाजाचे उपोषण आठव्या दिवशी मागे

जालना, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या २८ तारखेपासून ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी जालना शहरातील गांधी चमन येथे आमरण उपोषणाला बसलेल्या दीपक रणनवरे यांचे उपोषण सोडवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
दिपक रणनवरे हे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासोबतच मुलांना मोफत शिक्षण मिळावे तसेच सर्व शैक्षणिक सुविधा मोफत मिळाव्या या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री अतुल सावे या सर्व नेत्यांसोबत ब्राह्मण समाजाच्या श्रेष्ठ मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येणार असून येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून लवकरच समाजाच्या पूर्ण मागण्या पूर्ण केल्या जाईल अशी ग्वाही यावेळी उपोषणकर्त्यांना देण्यात आली आहे.
ब्राह्मण समाजाच्या वतीने सुरुवात करण्यात आलेल्या या उपोषणाची शासनाने दखल घेऊन जालना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गांधी चमन येथे उपोषण स्थळी दिपक रणनवरे यांच्याशी चर्चा करून शासन नक्कीच तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे , त्यासाठी १३ तारखेला मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या वतीने नागपूर येथे बैठक आयोजित केल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
ML/KA/SL
5 Dec. 2023