जरांगे पाटील आज पासून तिसऱ्या टप्यातील महाराष्ट्र दौऱ्यावर
जालना, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आज पासून सुरुवात झाली आहे.
आज भाऊबीजेच्या निमित्ताने गावातील महिलांनी जरांगे यांचे औक्षण करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
यानंतर उपोषण स्थळी पोहचताच जारांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली.
आपल्या या तिसऱ्या टप्याच्या दौऱ्यात ते ९ जिल्ह्यांत २४ सभा घेणार आहेत. प्रवासादरम्यान रस्त्यात जागोजागी त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
सरसकट मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंतची डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मुंबईत धडक देण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. दरम्यान,२ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण मागे घेतल्या नंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीगनर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रविवारी सायंकाळी रुग्णालयातून निघाल्यावर रस्त्यातील गावांना भेटी देत ते थेट आंतरवाली सराटी येथे दाखल झाले.गेली दोन दिवस गोदाकाठच्या ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांनी आपली काही रणनीती ठरवली आहे. आज बुधवारपासून ते राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले असून यात ते धाराशिव,सांगली सोलापूर,सातारा,कोल्हापूर,रायगड,पुणे,नाशिक,अहमदनगर ९ जिल्ह्यांत सभा घेऊन मराठा समाजाशी चर्चा करणार आहेत.आज १५ नोव्हेंबर रोजी आंतरवाली सराटी येथून सुरुवात झालेल्या दौऱ्यानंतर ते २३ नोव्हेंबरला पुन्हा आंतरवाली सराटी येथे दाखल होतील. Jarange Patil on third leg Maharashtra tour from today
ML/KA/PGB
15 Nov 2023