निधी वाटपाबाबत अजित पवारांनी केली महाविकास आघाडीची पोलखोल
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विकास निधीच्या वाटपात २०१९ ते २२ या काळात जे धोरण राबविण्यात आले त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे असमान निधी वाटप होत असल्याची तक्रार चुकीची आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं आणि विरोधकांनी त्यावर गदारोळ केला, यानंतर ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.
निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही, विविध योजनांसाठी पुरवणी मागण्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यात शेतकरी सन्मान योजना , साखर कारखान्यांना मदत , शेतकरी कर्ज परतफेड योजना आदींचा समावेश आहे असं पवार यांनी सांगितलं. ते पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते.
त्यांच्या उत्तराला विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, यात काँग्रेस सदस्य आघाडीवर होते. आमच्या मतदारसंघातील लोकांचा काय दोष आहे, आम्हाला निधीची आवश्यकता आहे तो द्या अशी मागणी नाना पटोले यांनी विनियोजन विधेयकाच्या वेळी केली. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पुतळ्याला आणि ऑलिंपिक स्टेडियमला महविकास आघाडी सरकारच्या काळात विरोध केला गेला , हे घडलं तेही चुकीचं होतं, त्यामुळे दुसऱ्याकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित धरणाऱ्या लोकांनी आपला कार्यकाळ ही पहावा असा टोला अजित पवार यांनी आपल्या उत्तरात लगावला , हे विधेयक मंजूर होताच विरोधकांनी सभात्याग केला.
ML/KA/SL
25 July 2023