ईर्शाळवाडीचे ग्रामस्थाना केले अत्यावश्यक दाखल्यांचे वाटप
अलिबाग , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुर्घटनाग्रस्त ईर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी आजपासून तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबीर लावण्यात आले होते. खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाच पाढे व वस्त्यातील नानिवली नम्रतावादी हे एक छोटसे गाव यापासून इरशाल गड च्या डोंगरावर साधारण एक ते सव्वा तासाच्या अंतरावर असलेल्या आदिवासी पाड्यावर 19 जुलै च्या रात्री दरड कोसळली आणि 48 पैकी जवळपास 39 कुटुंब व त्यांची घरे कोसळलेल्या दरडीतील मातीच्या ढिगार्याखाली सापडले. त्यांच्या अस्तित्वाचा शासकीय पुरावेच नष्ट झाले. केवळ त्यांचे नाव हीच त्यांची ओळख शिल्लक राहिली होती. या सर्व नागरिकांना स्वतंत्र शासकीय ओळख देण्याचा व त्यासाठी तातडीने अत्यावश्यक दाखले वितरण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. त्यानुसार सर्व जिल्हा स्तरीय यंत्रणा कामाला लागली. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी संबंधित तालुक्यातील अधिकारी यांची या कामासाठी नेमणूक केली. आज दिवसभरात विविध प्रकारचे कागदपत्रे व संजय गांधी योजनेअंतर्गत अनाथ 16, विधवा 5 श्रावणबाळ 1 असे लाभ संबंधितांना देण्यात आले. त्याचप्रमाणे 42 व्यक्तींना रेशन कार्ड व 57 जणांना आधार कार्ड चे वाटप करण्यात आले.याबरोबरच 41 कुटुंबाना सानुग्रह अनुदानाचे देखिल वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबास 5000 याप्रमाणे 2 लाख 15 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे देखील वाटप करण्यात आले.
ML/KA/PGB 23 July 2023