बोगस बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमती, विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शेतकऱ्यांची बोगस बियाणे आणि खते यात फसवणूक होऊ नये यासाठी १९६६ सालापासून अस्तित्वात असलेला जुना कायदा बदलून याच आठवड्यात नवीन कायदा आणतोय असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं , याशिवाय गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली, मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.
याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता, आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या आणि बियाण्यांच्या किमती कमी होऊन ही राज्यात का कमी झाल्या नाहीत असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकार यावर नफेखोरी करीत असल्याचा आरोप केला, काँग्रेसचे सदस्य यावर आक्रमक झाले होते.
अनेक कंपन्यांवर कारवाई झाली मात्र कायदा कमजोर असल्याने अपेक्षित परिणाम साधला जात नाही असं मंत्री म्हणाले म्हणूनच नवा कडक कायदा आणला जात आहे असेही त्यांनी सांगितले.
गेल्यावर्षी २४,९५९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलं होतं यावर्षी २८,२२६ कोटींची रक्कम वाटप झाली आहे अजून ३१ जुलै पर्यंत वेळ बाकी आहे असं मंत्री म्हणाले. केंद्राने आजवर एक कोटी तीस लाख रुपयांची सबसिडी देऊन खतांच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं.
राज्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुन्हा लसीकरण सुरू केलं आहे, गेल्या वेळच्या रोगाच्या साथी वेळचे अनुदान ज्यांना देणं बाकी आहे ते दिलं जात आहे अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
रोजगार हमी योजनेच्या विहिरी अनुदान देण्याची प्रक्रिया १५ ऑगस्ट पूर्वी पूर्ण केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली , यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी मंत्र्यांच्या उत्तरात हस्तक्षेप करून हे सांगितलं , त्याआधी मंत्री संदीपान भुमरे यांनी मागणीनुसार विहिरी अनुदान देण्यात येते, सत्तारूढ सदस्यांना च ते देण्यात येतं आणि विरोधकांना दिलं जात नाही हे खरं नाही असं स्पष्ट केलं होतं, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला होता.
ML/KA/SL
19 July 2023