नद्या आटल्या, पाण्याचा उपसा झाला बंद…
सांगली, दि. १४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): कृष्णा कोयना आणि वारणा या नद्यांच्या धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे त्यामुळे कृष्णा नदीवर पाणी उपसा बंदी लागू करण्यात आली आहे.
पाटबंधारे विभागाने सांगली व सातारा जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन व ताकारी उपसा सिंचन प्रकल्प क्षेत्रात 14 जून पासून चार दिवसासाठी पाणी उपसा बंदी लागू केली आहे. या आदेशामुळे हजारो हेक्टर बागायती पिकांना फटका बसणार आहे. सदर ठिकाणी पिके वाळून आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. सांगली जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस अद्याप झालेला नाही तसेच मान्सूनपूर्व उन्हाळी पाऊसही झालेला नाही.
नदी आणि धरणातून पाणीसाठा अत्यंत कमी आहे त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाची प्रतीक्षा आतुरतेने करताना दिसतो आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा शेतकरी वर्गाला अत्यंत जपून व काटकसरीने वापरावा लागणार आहे. आता सलग तीन दिवस पाणी उपशाला परवानगी असली तरी तेथून पुढे चार दिवस पाणी उपसा बंदी लागू राहणार आहे.
SL/KA/SL
14 June 2023