काँग्रेसने केले या नेत्याला पक्षातून निष्कासित
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेसचे वादग्रस्त नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असताना काँग्रेसने त्यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित केले आहे.
आशिष देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, मात्र आपल्या फटकळ स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या देशमुख यांचे तिथे फार दिवस पटले नाही त्यांनी मध्येच पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता.
पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेल्या देशमुख यांचे पक्षातील नेत्यांशी विशेषतः नागपूर आणि विदर्भातील नेत्यांशी अजिबात सख्य नव्हते. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही, यामुळेच त्यांच्यावर नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांनी दिलेले स्पष्टीकरण न पटल्याने त्यांना पक्षाच्या शिस्तपालन समितीने सहा वर्षांसाठी निष्कासित केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांचे भाजपाशी पुन्हा सुत जुळले असून पुन्हा सावनेर मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली आहे , या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही कारवाई केली आहे.
ML/KA/PGB
24 May 2023