यंदाची आषाढी वारी, हरित वारी- स्वच्छ वारी….

पंढरपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठीची प्रशासकीय बैठक आज पंढरपुरात संपन्न झाली. हरित वारी, स्वच्छ वारी या संकल्पनेवर यंदाच्या वारीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सुखकर व सुरक्षा संपन्न वारी पूर्ण करण्यासाठी सज्ज राहील.
29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे, 22 जून रोजी प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतील. यंदाच्या वारीमध्ये हरित वारी, स्वच्छ वारी या संकल्पनेवर आधारित वारीमध्ये पर्यावरण साक्षरतेचा जागर होणार आहे.
गतवर्षी दहा हजार वृक्ष लागवड पालखी मार्गावर प्रशासनाकडून करण्यात आली होती. यंदा अधिकची वृक्ष लागवड करून प्लास्टिक संकलन केंद्र उभा करून पर्यावरणाचा जागर होईल. तसेच महिलांच्या आरोग्य विषयक स्वच्छता तसेच सुरक्षेसाठीच्या विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. वारीच्या नियोजनासाठी पंढरपूर नगर परिषदेसह जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायती भाविकांसाठी उपाययोजना करतात.
जिल्ह्यात 33 ठिकाणी मुक्काम आणि ४४ ठिकाणी दहा मानाच्या पालख्यांचे विसावे असतात. यासाठी पिण्याचे पाणी , आरोग्य विषयक सुविधा ,पोलीस यंत्रणा सुरक्षा व्यवस्था आदीच्या उपाययोजना वारकरी भक्तांच्या सूचनेनुसार, लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार नव्याने बदल करून करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला.
संबंधित बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रांताधिकारी गजानन गुरव , निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
ML/KA/SL
23 May 2023