आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्याना न्यायालयाची चपराक, तेव्हा नैतिकता कुठे होती
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हाला बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिली असून नैतिकता म्हणून राजीनामा दिला म्हणणाऱ्यांनी काँग्रेस सोबत जाताना नैतिकता कुठे ठेवली होती असा सवाल करीत आम्ही आजच्या निर्णयामुळे समाधानी आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्य बाण आणि बाळासाहबांचे विचार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केला, असा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे. त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. निश्चितपणे हा लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्ण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे, यातील 4 ते 5 मुद्द्यांकडे मी आपले लक्ष वेधणार आहे. महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर कोर्टाने पाणी फिरवले आहे. ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने अतिशय स्पष्टपणे अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. कोर्टाने या आमदारांचे सर्व अधिकार कायम ठेवलेले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणाले की मी नैतिकतेच्या अधिकारावर राजीनामा दिला. पण मग भाजपसोबत निवडणूक लढवली आणि मविआसोबत गेलात तेव्हा तुम्ही नैतिकता कोणत्या डब्यात बांधून ठेवली होती? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी नैतिकतेची गोष्ट सांगू नये कारण त्यांनी खूर्चीसाठी विचार सोडला. तर एकनाथ शिंदे यांनी खूर्ची सोडून विरोधकांसोबत आले. उद्धव ठाकरेंनी हराण्याच्या लाजे पोटी आणि भिती पोटी राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे काही कारण नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार कायदेशीर आहे, यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे.
SL/KA/SL
11 May 2023