रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल
रत्नागिरी, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामानात प्रचंड होणारे बदल सहन करत अखेर आज फळांचा राजा रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान रत्नागिरी तालुक्याला मिळाला. गावखडीतून सहदेव पावसकर यांच्या बागेतून चार डझनाची पेटी पुणे मार्केटमध्ये तर गोळप येथील बावा साळवी यांचा दोन डझनचा बॉक्स मुंबई मार्केटमध्ये रवाना झाले आहेत.
चार डझनच्या या पेटीला २० हजार रुपये दर मिळेल, असा विश्वास बागायतदार पावसकर यांनी व्यक्त केला. गेल्या 4 महिन्यापासून ते आपल्या बागेची सर्वतोपरी निगा राखत होते.
सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे त्रस्त झालेल्या कोकणातील आंबा बागायतदारांसाठी पहिली पेटी बाजारात दाखल होणे ही दिलासादायक बातमी आहे. अर्थातच अशी आवक क्वचितच होत असून सर्वसाधारणपणे हापूस आंबा बाजारात यायला मार्च महिना उजाडतो.
The first box of Hapus Mango from Ratnagiri district entered the market
SL/KA/SL
3 Jan. 2023