आगरी समाजाला मायभूमीतूनच बेदखल करण्याचे षडयंत्र
मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): रोहा, मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन परिसरातील ४० गावांच्या हद्दीत सिडकोमार्फत स्वप्ननगरी उभी केली जात आहे. एवढं करून भागलं नाही म्हणून आता ठाणे, रायगड, पालघर या तीन जिल्ह्यांतील हजार गावांतील स्थानिक नागरिकांच्या मानगुटीवर नैनाचे भूत बसविले जात आहे.मूळनिवासी असलेल्या आगरी समाजाला आपल्या मायभूमीतूनच बेदखल करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले की, मुंबईतील गर्दी हटविण्याच्या नावाखाली नवी मुंबई वसविण्यासाठी सुरुवातीला १५ गावांना उध्वस्त केले. आता नव्या मुंबईला पर्याय म्हणून तिसऱ्या मुंबईसाठी खोपटा परिसरातील ३२ गावांना विस्थापित केलं जात आहे. असे सांगून पाटील म्हणाले की, भूसंपादनाचं शुक्लकाष्ठ लावल्यामुळे समाज भूमीहीन होऊ लागला आहे,नैनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर घोर अन्याय होत आहे. वाढत्या मँग्रोजच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांचा मालकी हक्क संपुष्टात येऊ लागला आहे.गरजेपोटी बांधलेल्या घरांना संरक्षण मिळत नाही, नोकर भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे. सिध्दिविनायक मंदिर समितीवर आगरी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.
SW/KA/SL
16 Dec. 2022