२०२६- २७ पीक कर्जासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 16 : राज्यातील शेतकऱ्यांकडून खरीपाचा हंगामाची तयारी सुरू असताना २०२६-२७ साठी पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँक आणि विकास संस्थांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या नियमांनुसार ७/१२ उताऱ्यावरील सामाईक क्षेत्रावर स्टॅम्पद्वारे संमती घेऊन कर्ज वाटप करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. ७/१२ उताऱ्यावर नमूद असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असा बँकेचा दावा आहे.
नवीन नियमांनुसार, सामाईक मालकीच्या जमिनीवर पूर्वीप्रमाणे एकाच नावावर संमतीपत्र घेऊन कर्ज देण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नावावर असलेल्या हिस्स्यानुसारच कर्ज दिले जाणार आहे. या नियमांचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्ज मंजुरी प्रक्रिया जबाबदार धरण्यात येणार आहे.
या धोरणाचा परिणाम जिल्ह्यातील सुमारे ७ हजार शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. अनेकांना वेळेत कर्ज मिळण्यात अडचणी येत असून, नवीन खातेदारांना कर्ज मंजुरीसाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.
यापूर्वी सामाईक खातेदारांकडून संमतीपत्र (अॅफिडेव्हिट) घेऊन एका व्यक्तीच्या नावावर कर्ज दिले जात होते. मात्र, अशा कर्जांवर शासनाकडून मिळणाऱ्या व्याज परताव्यात अडचणी निर्माण झाल्या. अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना व्याज सवलत मिळाली नाही, त्यामुळे बँकांनी ही रक्कम विकास संस्थांकडून वसूल केली.
SL/ML/SL