बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही

 बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही

पुणे दि ९ : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. एकूण ५३ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी तीस उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर आता इथे एकूण २३ उमेदवार रिंगणात असून त्यात बहुतांश अपक्ष उमेदवार रिंगणात राहिले असून त्यामुळे महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकीबाबत आज सकाळपासून राज्यात राजकीय विविध घडामोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळाले. महाराष्ट्राची सभ्यता, सुसंस्कृतपणा विचारात घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार घेतली असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बारामतीतून उमेदवारी माघारी घेतली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम, २०२९ ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल असे सपकाळ यावेळी म्हणाले.

बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत, आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *