साधकाचा आध्यात्मिक प्रवास म्हणजे मनबाधा
मुंबई, दि. ७ : कवी, पत्रकार
प्रशांत डिंगणकर यांचे ‘मनबाधा’ हे पुस्तक एका साधना करणाऱ्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे. ते आध्यात्मिक शक्तीची राधा शोधताना,त्या आध्यात्मिक प्रवासातल्या टप्प्यांचे प्रवास वर्णन आहे, ती एक शक्ती असल्यामुळे, तिच्या शोधात तो निघाला आहे. हा, निर्गुण, निराकार, ते सगुण, साकार, शक्तीचा, त्या शक्ती रूपी राधेचा शोधण्याचा हा प्रवास असल्याचे गौरवोद्गगार सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले. तर यावेळी बोलताना ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर यांनी १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्वामीराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या आणि प्रशांत डिंगणकर लिखित ‘मनबाधा’ या पुस्तकाचे पु.ल.अकादमीच्या लघु नाट्यगृहात प्रकाशन झाले त्यावेळी मंत्री शेलार बोलत होते. यावेळी यावेळी ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे, कवी डॉ. महेश केळुस्कर, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, प्रकाशक रजनिश राणे यांच्यासह गझलनवाझ भिमराव पांचाळे, कवी अशोक नायगावर, प्रा. नरेंद्र पाठक , ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, लेखक संजय कृष्णाजी पाटील, डॉ. विणा सानेकर यांच्यासह प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर कवी, लेखक आदी उपस्थित होते.
मंत्री अॅङ शेलार पुढे म्हणाले, ‘मनबाधा’ हे पुस्तक वाचताना लेखक काहीतरी शोधतोय आणि ती राधा आहे. हे पुस्तक केवळ ललितबंधाचे असं मला वाटत नाही. याची व्याप्ती त्या ठिकाणी मोठी झालेली दिसते. आणि म्हणून, या पुस्तकात अद्भुत अशा पद्धतीचा वाङ्मयीन, तथा अध्यात्मिक प्रवाससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. हे पुस्तक राधा शोधताना टप्प्याचे प्रवासवर्णन आहे. निर्गुण निराकार ते सगुण साकार शक्तीचा हा प्रवास आहे. हा ललित ग्रंथ असला तरी यात तात्विक विधाने करत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, कवी प्रवीण दवणे यांनी ‘मनबाधा’ या पुस्तकातून लेखकाने वेगळी शैली निवडली. पंच तत्वातून राधा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला. लेखकाची ही एक वेगळी शोधयात्रा असून या पुस्तकाला कवितेचे परिमाण लावावे असा हा एक ललितबंध असल्याचे ही दवणे म्हणाले. तर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे शहर हे कलावंतासाठी अधिक प्रेरक ठरावे यासाठी ठाणे महापालिका करीत असलेल्या विविध उपक्रमांचा उहापोह आपल्या भाषणात केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार यामिनी दळवी यांनी केले.
दरम्यान, ‘मनबाधा’ या पुस्तक प्रकाशनाच्या ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुस्कर यांनी १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत व्हावे, अशी मागणी केली. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. मुंबईत खूप वर्षे हे संमलेन झालेले नाही. इथे सगळ्या सोयी असल्याने ते इथे घ्यावे अशी मागणी करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.ML/ML/MS