महानगरपालिकेतील १००० कोटी रुपयांची टेंडर फक्त रद्द करुन चालणार नाही; चौकशी करून दोषींवर कारवाई करा. – सुरेशचंद्र राजहंस.
मुंबई, दि ५
मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून भाजपा व एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात मलई खाण्यावरून वाद झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशासक राजवटीत मुंबईकरांच्या पैशावर दरोडा टाकल्याचे काँग्रेस पक्षाने सातत्याने पुराव्यासह उघड केले आहे. आता १ हजार कोटी रुपयांची टेंडर रद्द केल्याने काँग्रेसच्या आरोपांना दुजोराच मिळाला आहे. केवळ टेंडर रद्द करून चालणार नाही तर या भ्रष्टाचाराच्या दलदलीत सहभागी असलेल्या अधिकारी व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची चौकशी करून कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, मुंबई काँग्रेसने महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभारावर पत्रकार परिषदांची मालिका घेऊन पितळ उघडे केलेले आहे. भाजपा व शिंदेसेना हे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत, त्यांना मुंबईकरांचे हित, मुंबईकरांना चांगल्या आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी, पिण्याचे पाणी, बेस्ट सेवा देण्यासाठी काहीही करायचे नाही, त्यांनी केवळ लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरणे व टक्केवारीतून स्वतःची घरे भरण्याचे काम केलेले आहे. ३.५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या प्रशासक राजमध्ये महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला आहे. केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्यातून १ हजार कोटी रुपयांची कंत्राटे रद्द करण्यात आलेली आहेत. आम्हाला महायुतीच्या कुरघोडीच्या राजकारणात पडायचे नाही तर मुंबईकरांच्या पैशाचा हिशोब भाजपा व शिवसेना महायुतीला द्यावा लागेल.
भारतीय जनता पक्ष आज पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहे पण मुंबईची तिजोरी लुटण्यात भाजपाही मागे नाही. बीएमसीच्या बँकेतील ठेवी काय चाटायच्या आहेत का, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते आणि यातूनच त्यांनी बीएमसीतील ९० हजार कोटींच्या ठेवी मोडून खिसे भरण्यास सुरुवात केली आहे, हा पैसा मुंबईकरांच्या कष्टाचा आहे, भाजपा शिवसेनेचा नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. मुंबईतील फक्त कंत्राटात भ्रष्टाचार झालेला नसून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणची शेकडो एकर जमीन मोदानीला कोणी दिली? मोदानीसाठी नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून मोदानीच्या हितासाठी नियम कोणी बनवले?. भाजपाला जर खरेच ‘भ्रष्टाचारमुक्त मुंबई’ करायची असेल व ‘पारदर्शकता’ आणायची असेल तर महानगरपालिकेतील सर्व कामांची व मुंबईला लुटणाऱ्या कामांची, मोदानीला मुंबई विकण्याच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हानही सुरेशचंद्र राजहंस यांनी दिले आहे.JS/ML/MS