घरगुती वाद म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे- न्यायालयाचा निर्वाळा
नागपूर, दि. १ : कौटुंबिक कलह आणि पती-पत्नीमधील वादातून पतीने टोकाचे पाऊल उचलल्यास, त्यासाठी पत्नीला कायदेशीररित्या जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील एका जुन्या प्रकरणात पत्नीवर दाखल झालेला गुन्हा रद्द करताना न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयाने पत्नीची याचिका मंजूर करत तिच्याविरुद्ध अमरावती पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि सुरू असलेला खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे वैवाहिक वादाच्या प्रकरणांत ‘आत्महत्येस प्रवृत्त’ करण्याच्या कलमाचा वापर करताना पोलिसांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत हे प्रकरण घडले होते. 26 नोव्हेंबर 2019 रोजी संबंधित पतीने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती. मृताच्या वडिलांनी (सासऱ्याने) आपल्या सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. पत्नी पतीला शिवीगाळ करायची, क्षुल्लक कारणावरून भांडण करून माहेरी जायची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायची, ज्यामुळे पतीने आत्महत्या केली, असा दावा तक्रारीत करण्यात आला होता.
SL/ML/SL