पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये वाटा
मुंबई, दि. ३१ :
धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, या यशानंतर आता एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानातील कराचीमधील ल्यारी भागातील रहिवाशांनी चित्रपटाच्या कमाईत आपला वाटा असावा, अशी अजब मागणी लावून धरली आहे. काही स्थानिकांनी तर चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी 80 टक्के हिस्सा ल्यारीच्या विकासासाठी देण्याचे आवाहन केले आहे.या मागण्यांवर आतापर्यंत दिग्दर्शक आदित्य धर किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या विषयावरून मोठी चर्चा रंगली असून, चित्रपटात दाखवलेल्या भागांना किंवा समुदायांना आर्थिक नफ्यात वाटा द्यावा का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये ल्यारीचे रहिवासी असा तर्क मांडत आहेत की, ‘धुरंधर’ चित्रपटात त्यांच्या भागाचे नाव आणि पार्श्वभूमी वापरली गेली आहे. त्यामुळे या व्यावसायिक यशाचा फायदा स्थानिक समुदायाला मिळणे आवश्यक आहे. “जर भारताने पैसे दिले, तरच आमच्या भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधा सुधारू शकतात,” असे एका रहिवाशाने म्हटले आहे. शेकडो कोटी रुपये सार्वजनिक कल्याणासाठी खर्च केले जावेत, असे मत या लोकांनी व्यक्त केले आहे.
रहिवाशांच्या मते, या चित्रपटाने ल्यारीची ओळख आणि तिथल्या परिस्थितीचे भांडवल करून मोठी कमाई केली आहे. या भागातील खराब रस्ते आणि सुविधांचा अभाव अधोरेखित करत त्यांनी असा दावा केला की, कथेतील खरेपणा हा ल्यारीच्या वास्तवावर आधारित आहे. त्यामुळे 70 ते 80 टक्के वाटा हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
SL/ML/SL