मुंबईकरांच्या हक्कासाठी संसदेत खा.संजय दिना पाटील यांची जोरदार भूमिका
मुंबई, दि. १८ – मुंबईकरांच्या दैनंदिन अडचणी, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संसदेत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी अत्यंत ठाम, आक्रमक व प्रभावी पद्धतीने आवाज उठवला. जनतेच्या प्रश्नांवर तडजोड नाही, हीच भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका करताना, त्यांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना केली जात आहे. असा प्रश्न हि केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनही त्यांना सेवा सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे मंगळवारी संसदेत बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य व प्रेरणादायी पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी संसदेत केली. मुंबई लोकल मधील वाढती गर्दी व अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त करत, वातानुकुलीत (एसी) लोकल वाढवण्याच्या धोरणामुळे नॉन-एसी गाड्यांवर ताण वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांचे प्राण वाचवायचे असतील तर गाड्यांची संख्या वाढवणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ दरवाजे बंद करून समस्या सुटणार नाही, तर रेल्वे प्रशासनाने तातडीने अतिरिक्त गाड्या सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
रेल्वे अपघातानंतर जखमी प्रवाशांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीवितहानी होत असल्याचे निदर्शनास आणत, प्रत्येक रेल्वे स्थानकावर सर्व सुविधांनी सुसज्ज, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. प्रवाशांचे प्राण वाचवणे ही रेल्वेची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, मतदारसंघातील गेल्या ५० वर्षांपासून रेल्वे जमिनीवर वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांचा गंभीर प्रश्न त्यांनी संसदेत मांडला. एसआरए अंतर्गत इतरांना घरे मिळत असताना या कुटुंबांना वंचित ठेवणे हा सरळ अन्याय असल्याचे सांगत, केंद्र व राज्य सरकारने संयुक्त गृहनिर्माण धोरण तात्काळ जाहीर करून या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
मुंबईहून वेलंकन्नी, अयोध्या व तिरुपती बालाजी या धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, तसेच प्रवाशांच्या धार्मिक भावनांचा आदर राखत प्रवाशांना सोयीस्कर व सुरक्षित प्रवास मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कोविड काळात बंद करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे सवलती तात्काळ पुन्हा सुरू कराव्यात, अन्यथा या प्रश्नावर जनआंदोलन उभे राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
हे सर्व मुद्दे केवळ राजकारणाचे नाहीत, तर सामान्य मुंबईकरांच्या जगण्याशी थेट संबंधित आहेत. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा खासदार संजय दिना पाटील यांनी दिला.ML/ML/MS