प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य
मुंबई, दि. १२ : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार टॅक्सी, रिक्षा, ॲप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये “क्यूआर कोड” बसविण्यात येणार आहे. यावरून वाहन चालकाचे नाव, नंबरसहित गाडीचे ठिकाणही प्रवाशाच्या निकटवर्तीयांना समजू शकणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशात टॅक्सी, रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या सुमारे ८० ते ९० टक्के तक्रारी आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार टॅक्सी, रिक्षा किंवा ॲप आधारित गाडीचालक भाडे नाकारू शकणार नाही. यासाठी वेगळी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. विदेशातील सेवा वाहनांच्या धर्तीवर प्रत्येक गाडीत एक “क्यू आर कोड” लावणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसह भाडे नाकारल्यास त्याची माहिती तातडीने कंट्रोल रूमला कळणार आहे. गाडीच्या चालकाची माहिती, गाडी कुठे आहे याचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांच्या जवळील व्यक्तीला समजू शकणार आहे. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ते फायदेशीर ठरणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
बनावट कागदपत्रे बनवून बांगलादेशी रिक्षा चालवत होते. त्यामुळे रिक्षा परवाने देण्यास स्थगिती देण्यात आली आहे. हेच परवाने स्वातंत्र्यसैनिक किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सरनाईक म्हणाले. तसेच शेअर रिक्षांकडून होणाऱ्या लुटीलाही लगाम लावण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. एसटी महामंडळ ‘ईव्ही’ गाड्या खरेदी करण्यास भर देत आहे. त्यामुळे २०३५ मध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकही बस डिझेल इंधन आधारित नसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. एसटी महामंडळाला आयपीएस दर्जाचा दक्षता व सुरक्षा अधिकारी मिळावा हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच एसटी महामंडळाला दक्षता व सुरक्षा अधिकारी मिळेल, असेही ते म्हणाले.