१ मार्चपासून मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी होणार सुरू
मुंबई, दि. २१ : शिमग्यासाठी कोकणातील गावी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आता अजून एक नवा वाहतूक पर्याय सुरू होत आहे. मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे. समुद्रमार्गे प्रवासी आणि वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा मिळणार असल्याने कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे. या सेवेचा शुभारंभ सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिले तिकीट बुक करून केला. ही सेवा एम२एम कंपनीमार्फत चालवली जाणार आहे.
१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली फेरी सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल.
परतीची फेरी २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटून सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल.
मार्च महिन्यात एकूण १६ फेऱ्या नियोजित
मुंबई ते विजयदुर्ग: १, ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च
विजयदुर्ग ते मुंबई: २, ५, ८, १२, १५, १९, २२, २६ मार्च
प्रारंभीच्या टप्प्यात प्रवाशांचा प्रतिसाद आणि सेवेची कार्यक्षमता (ऑपरेशनल फिजिबिलिटी) तपासण्यासाठी हे टप्प्याटप्प्याने वेळापत्रक आखण्यात आले आहे. प्रतिसाद समाधानकारक मिळाल्यास भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो.
तिकीट दर
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचे प्रस्तावित दर पुढीलप्रमाणे :
इकॉनॉमी: २,५०० रु.
प्रीमियम इकॉनॉमी: ४,००० रु.
दुचाकी: १,००० रु.
सायकल: ६०० रु.
चारचाकी: ६,००० रु.
ही फेरी प्रवाशांसह वाहनांची वाहतूक करणार असल्याने स्वतःची गाडी घेऊन कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे. रस्त्याने १०-१२ तासांचा प्रवास करण्याऐवजी समुद्रमार्गे निसर्गरम्य आणि तुलनेने आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
SL/ML/SL