रस्ता रुंदीकरण, पाणी प्रश्नांवर नगरसेवकांची बैठक
नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालिका अधिका-यांना विचारला जाब
मुंबई, दि. १८ – भांडुप विधानसभेतील नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भांडुप मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच सर्व विभागातील पालिका अधिकारी उपस्थित होते. पाणी, सुलभ शौचालय, रस्ता रुंदीकरण या सारख्या विषयांवर जोरदार चर्चा करण्यात आली.
भांडुप परिसरातील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर या ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न असून तो तातडीणे सोडविण्यात यावा, तसेच या भागात रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुक कोंडी होते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहीका, अग्निशमन दलाच्या गाड्याना रस्ता मिळत नाही. त्यामुळे या भागात पर्यायी रस्ता व रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केली.

सोनापुर येथील जुन्या बांधकामांना अनधिकृत सांगुण अधिका-यांव्दारे दबाव तंत्राचा वापर करीत काही लोकांची घरे तोडण्यात आली. तर काहींना नोटीसा दिल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांना बांधकामधारकच नव्हे तर अधिकारी ही जबाबदार असल्याचे कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका आशा कोपरकर यांनी सांगितले. बाहेरून येणा-या लोकांना भांडुप मध्ये तात्काळ घरे देण्यात आली. मात्र भांडुप मधील लोकांना भांडुप मध्ये घरे न देता त्यांना बाहेर पाठविण्यात आल्याचा आरोपही नगरसेवकांनी या बैठकीत केला. पाणी प्रश्न हा गंभीर मुद्दा असून त्यावर तातडीने काम करण्याची गरज आहे. सुलभ शौचालयाचा प्रश्न असो वा नाले, गटारे, परिसरातील स्वच्छता यावर ही तातडीने काम करण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी आजच्या बैठकीत केली. या सर्व पक्षीय बैठकीला नगरसेविका राजोल पाटील, दिपमाला बढे, आशा कोपरकर, सुरेश शिंदे, साक्षी दळवी, ज्योती राजभोज व जागृती पाटील तसेच एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद व एस विभागातील सर्व पालिका अधिकारी उपस्थित होते.ML/ML/MS