राज्यातील पहिल्या पाळीव प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण

 राज्यातील पहिल्या पाळीव प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण

मिरा-भाईंदर दि ३० :
पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची व्यवस्था आता प्रत्यक्षात आली आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्मशानभूमीचे म्हणजेचे नवघर स्मशानभूमीचे लोकार्पण आज सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून करण्यात आले.

पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची गंभीर समस्या

आतापर्यंत पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह नदी-नाले, खाडीकिनारा, गटारे, कचरा कुंडी किंवा लांब खुल्या ठिकाणी टाकले जात असल्याने दुर्गंध आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होत होता. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या पसरण्याचे प्रमाण ही वाढत होते. तसेच राज्यात कुठेही पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची सुसज्ज सुविधा नव्हती. परंतु आता मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले असून प्राणीप्रेमींसाठी हि एक दिलासा देणारी आणि आदर्शवत अशी सुविधा उपलब्ध झाली आहे.

पाळीव प्राणी गॅस शवदाहिनीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल

नवघर स्मशानभूमी येथे साकारण्यात आलेली पाळीव प्राण्यांची शवदाहिनी ही पूर्णपणे गॅस शवदाहिनी असणार आहे. हि एक पर्यावरणपूरक सुविधा असून प्राण्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नैसर्गिक वायू आणि प्रोपेन (LPG) चा वापर या शवदाहिनी मध्ये केला जातो. या प्रक्रियेमुळे मृतदेहाचे मुलभूत रासायनिक संयुगामध्ये रुपांतर होते, जसे कि वायू आणि राख. पाळीव प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या शवदाहिनीमुळे लाकूड जाळून होणारे प्रदूषण देखील रोखले जाईल. मिरा-भाईंदर शहरात नवघर आणि काशिमिरा येथे अशा दोन ठिकाणी पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. ज्यातील पहिल्या म्हणजेच नवघर स्मशानभूमीचे लोकार्पण झाले असून लवकरच दुसऱ्या म्हणजे काशिमिरा येथील स्मशानभूमीचेही लोकार्पण केले जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकार्पणानंतर मिरा-भाईंदर शहरात प्राणीप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, पर्यावरण संवर्धन आणि प्राण्यांप्रती असलेली आपुलकी या दोन्ही गोष्टींचा संगम साधल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले कि, “पाळीव प्राणी हे अनेक घरात कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. त्यांच्या अंत्यविधीसाठी सन्मानपूर्वक आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देणे हि काळाची गरज होती. मिरा-भाईंदरमध्ये उभारण्यात आलेली राज्यातील हि पहिली पाळीव प्राण्याची स्मशानभूमी राज्यातील इतर शहरांसाठी आदर्श निर्माण करेल. भविष्यात इतर शहरांमध्येही अशा सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लोकार्पणामुळे मिरा-भाईंदर शहरात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि प्राणीप्रेमींच्या भावनांचा सन्मान या तिन्हीचा संगम साधला गेला आहे.”ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *