रेल्वेने जोडले जाणार भारत आणि भूतान

 रेल्वेने जोडले जाणार भारत आणि भूतान

नवी दिल्ली,दि. २९ : भारत आणि भूतान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने नुकतेच दोन महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मंजूर केले असून यामुळे भारतातून थेट भूतानमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील दळणवळण, व्यापार आणि पर्यटनाला मोठा चालना मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम पुढील चार वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, भविष्यात भारतातून भूतानला रेल्वेने प्रवास करणे एक सहज आणि सुलभ अनुभव ठरणार आहे.

या प्रकल्पांतर्गत दोन स्वतंत्र रेल्वे मार्गांची निर्मिती होणार आहे:

कोक्राझार (आसाम) ते गेलेफू (भूतान)** – ६९ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यासाठी अंदाजे ₹३,४५६ कोटी खर्च अपेक्षित आहे.

बनारहाट (पश्चिम बंगाल) ते समत्से (भूतान)** – २० किलोमीटर लांबीचा दुसरा मार्ग असून यासाठी ₹५७७ कोटी खर्च होणार आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. समत्से आणि गेलेफू ही भूतानमधील महत्त्वाची निर्यात-आयात केंद्रे आहेत. या रेल्वे मार्गांमुळे त्या केंद्रांना भारताकडून अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.”

या प्रकल्पामुळे भूतानमध्ये प्रथमच रेल्वे सेवा सुरू होणार असून भारताशी थेट जोडणी निर्माण होईल. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटन वाढेल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प पूर्णपणे द्विपक्षीय असून यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाही.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *