९७ व्या मराठी साहित्य संमेलनास सुरुवात, जाणून घ्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणातील मुख्य मुद्दे

अमळनेर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साने गुरुजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या अमळनेर नगरीत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज मोठ्या दिमाखात उद्गाटन झाले. साहित्यिक रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे व महामंडळाचे सर्व पदाधिकारी, आयोजक उपस्थित होते.
यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी परखड भाषेत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले.
बेरोजगारीचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. बेरोजगारीच्या याच विवंचनेतून शेतकऱ्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले तर ते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे? एक लक्षात ठेवा, तरुणांची ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असती. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, अशा थेट शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी सरकारला इशारा दिला.
शिक्षण क्षेत्रात आता आपल्याला काहीही करायचे नाही, असे ठरवून सरकारने या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेतर तर दुसरीकडे आज हजारो उच्चशिक्षित तरुण प्राध्यापकाची नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत म्हातारे झाले आहेत. शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली आहे. हे खूप धोकादायक आहे. तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात, असा खडा सवालही शोभणे यांनी केला.
प्राचिन काळी धर्म सर्वाेच्चपदी होता. धर्मसत्ताक राज्ये ही धर्माची वेगळी गरज म्हणून निर्माण झाली. पुढे राजसत्तेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देत धर्मसत्तेलाच आपल्या अंकित ठेवले.पुढे हाच राजा सर्वाेच्च समजला जाऊ लागला, धर्माचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला, इतिहासाची हीच चक्रे आता पुन्हा नव्या रूपाने फिरू लागली आहेत, असे प्रतिपादन करत त्यांनी सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही परखड भाष्य केले.
SL/KA/SL
2 Feb. 2024