देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले तर ७०० कोटी वृक्ष लागवड होऊ शकते. त्यामुळे या पर्यावरणीय जनजागृतीसाठी इको फ्रेंडली लाईफ या सामाजिक संस्थेने देशभरात आंबा, जांभूळ यासारखी ११ प्रकारची वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे . स्वतः २६ हजार ७०० वृक्ष महाराष्ट्र व गोवा या राज्यात लाऊन पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला आहे. चार वर्षे हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. अशी माहिती पर्यावरण बचाओ आंदोलनाचे प्रणेते व इको फ्रेंडली लाईफ चे संस्थापक अध्यक्ष अशोक एन. जे. यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना अशोक एन जे म्हणाले, भारतात तरुण वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यांना सोबत घेत हि जनजागृती सुरू आहे. बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि फसवणूक अशा अनेक समस्यांमध्ये खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढायचे असेल तर तरुणांच्या हाती पर्यावरण रक्षणाची जवाबदारी दिली पाहिजे असे अशोक त्यांनी सांगितले.
७०० कोटी झाडे लावण्याचा महासंकल्पामध्ये तरूण वर्ग सहभाग घेत आहे. त्यांनी घेतलेला पर्यावरण रक्षणाचा वसा इतर तरूणांनीही घ्यावा म्हणून हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी हे पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे संयोजक राहुल गायकवाड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
SW/ML/PGB
9 Sep 2024