प्रमाणित बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना या राज्यात ५० टक्के सवलत

लखनऊ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पारंपरिक बियाणांचा वापर करण्या ऐवजी प्रमाणित बियाणे वापरल्यास धान्य उत्पादन वाढण्यास मदत होते.मात्र सर्वच शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी खर्च करणे परवडत नाही. याचा विचार करून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणित बियाणे योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीवर थेट ५० टक्के सवलत देणार आहे. नवीन प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांच्या खरेदीवर ही सवलत देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यासाठी कृषी विभागाकडून निधीही प्राप्त झाला आहे.
प्रमाणित बियाण्याचे महत्त्व
प्रमाणित बियाणे सरकारच्या प्रमाणन संस्थेने ठरवून दिलेल्या मानांकनानुसार प्रमाणित केले जातात. बियाण्यांच्या पिशव्यांवर बियाणे उत्पादकाची आणि बियाणे प्रमाणिकरण संस्थेच्या माहितीचे लेबल लावलेले असते.यावर संस्थेच्या प्रतिनिधीची स्वाक्षरही असते. अन्न सुरक्षा मोहिमेला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाण्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रमाणित बियाण्यांमुळे पीक उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होते.
यापूर्वीच्या प्रणाली अंतर्गत बियाण्यांच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात होती. मात्र, पूर्वीच्या पध्दतीत बँक खात्याशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत होते. नव्या प्रणालीमुळे अशा सर्व शेतकऱ्यांना थेट ५० टक्के सवलतीचा लाभ होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रमाणित बियाणे खरेदी योजनेच्या जुन्या पध्दतीमध्ये बदल केले आहेत. पूर्वीच्या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना बियाणे खरेदी केल्यानंतर बियाण्यांच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान स्वरूपात जमा केली जात होती. या पध्दतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.अनेक शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक नव्हती किंवा कागदपत्रे अपूर्ण होती, अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. मात्र, आता नवी प्रणाली लागू झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार आहे.
SL/ML/SL
26 March 2024