मराठवाड्याला विकासकामांसाठी ४५००० कोटींचा निधी

छ. संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेले राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुष्काळसद़ृश परिस्थिती, सिंचन अनुशेषच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तब्बल सात वर्षांनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नदीचे जोड प्रकल्पाचे १४ हजार कोटी वगळून ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हणजेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा दिला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. स्मार्ट सिटी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंचन प्रकल्पासह आरोग्य, पशुसंर्वधन विभागाशी संबंधित निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत.
राज्यात सत्तेत आल्यापासून महायुती सरकारने ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे ८ लाख हेक्टर ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. काही लोक घोषणा करतात पण त्याचा निर्णय होत नाही. पण वर्षभरात महायुती सरकारने सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
शनी देवगाव उच्च पातळी बंधाऱ्याला २८५ कोटी, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार कोटींची मान्यता, औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ६० कोटी, मराठवाड्यातील दूध उत्पादनाला वेग देण्याच्या प्रस्तावित योजनेसाठी ३ हजार २२५ कोटींचा निधी, एका गावात किमान ५० दुधाळ जनावारांचे अनुदान तत्त्वावर वाटप, नांदेडमध्ये गोदावरी घाट साबरमती नदीच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट म्हमऊन विकसित करण्यासाठी १०० कोटी प्रस्तावित तसेच तुळजा भवानी मंदिर विकासासाठी १३८५ कोटी, परभणीच्या पाथरीतील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ९२ कोटी, मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीसाठी २८४ कोटी, पुणे – संभाजीनगर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यास १८८ कोटी अशा विविध विकास योजनांची यात समावेश आहे. आदर्श पतसंस्थेच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन लोकांचे पैसे देणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधकांनी काय केले
विरोधकांनी अडीच वर्षात काय केलं? असा सवाल करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील ठाकरे सरकारने प्रंलबित ठेवलेल्या महत्त्वांच्या प्रकल्पांना आमच्या सरकारने मान्यता दिली असल्याचे सांगितले. वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्राकडून मदत घेणार आहे. वॉटर ग्रीड प्रकल्पाचा तत्त्कालीन ठाकरे सरकारने खून केला असा आरोपही फडणवीस यांनी केला. २०१६ साली मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या एकूण ३१ निर्णयांचे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत केले.
२३ प्रकल्प पूर्ण केले असल्याची माहिती त्यांनी दिली. ७ प्रकल्पांची अमलबजावणी चालू आहे आणि १ प्रकल्प म्हणजेच मराठवाडा वॉटर ग्रीड मागील सरकारमुळेच रखडले, यावेळी एकूण १०६ प्रकल्पांना मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरात सात वर्षांनंतर झालेल्या बैठकीसाठी २९ मंत्री आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक विभागाचे मंत्री हजर होते.
ML/KA/SL
16 Sept. 2023