पुण्यातील हिंजवडी IT पार्कमधील ३७ कंपन्या परराज्यात स्थलांतरित

पुणे, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील अनेक अवजड उद्योग आणि कंपन्या गेल्या काही वर्षांपासून शेजारील गुजरात आणि अन्य राज्यांंमध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायात देशातील अग्रेसर राज्य म्हणून असलेली महाराष्ट्राची ओळख पुसली जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे आता राज्यातील IT कंपन्या देखील अन्य राज्यांत स्थलांतरीत होत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ IT हब असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक कंपन्या येथील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतर करत आहेत. येथील तब्बल ३७ कंपन्या राज्याबाहेर गेल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमुळे पुण्याची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे. येथील IT कंपन्यामुळे या परिसराचा गतीमान विकास झाला आहे. मात्र, या विकासाला आता ट्रॅफिक जॅमच्या समस्येने ग्रासले आहे. यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी महाराष्ट्राबाहेर स्थलांतर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अद्याप ३७ कंपन्या राज्याबाहेर गेल्या असून आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर जाण्याच्या विचारात आहेत. या घटनेची दखल उद्धव ठाकरे यांनी X प्लॅटफॉर्मवरून शिंदे सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसीस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने तरुण काम करतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्याने कंपन्यांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या तर आणखी गंभीर होते. यामुळे पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पुण्यात मेट्रोची कामे सुरू असल्याने त्यात आणखी भर पडली आहे. पुण्यात हींजवडी येथे कंपनीत जाणाऱ्यांची संख्या मोठी असते.वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचारी कंपनीत वेळेवर पोहोचू शकत नाही. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम देखील बंद केले आहे. या साऱ्या समस्यांना कंटाळून कंपन्यांनी स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला आहे.
SL/ML/SL
30 May 2024