राज्यात पाच महिन्यांत 30 हजार नागरिक बेपत्ता

मुंबई, दि. २४ : राज्यातील 30 हजारांहून अधिक नागरिक गेल्या ५ महीन्यांत बेपत्ता असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये 18 पेक्षा जास्त वयाच्या 12,467 पुरुष आणि 17646 स्त्रियांचा समावेश असून एकूण आकडा 30 हजार 113 असा आहे. 18 वर्षे वयाखालील व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्याची नोंद किडनॅपिंग अंतर्गत केली जाते, हे येथे उल्लेखनीय आहे. पोलीस विभागातील माहितीच्या आधारे ही बातमी समोर आली आहे.
यापैकी सर्वाधिक 3 हजार 473 लोक एकट्या मुंबईतून बेपत्ता झाले आहेत. याच कालावधीत ठाणे शहर येथून 2003 लोक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अहिल्यानगर हे छोटे शहर असून देखील त्याचा माणसे हरवण्याच्या यादीत पहिल्या पाच शहरात समावेश झाला आहे. पाच महिन्यांत तेथून 1,411 बेपत्ता झाले आहेत. पुणे शहर येथून 1364 लोक बेपत्ता झाले आहेत. नाशिक ग्रामीण येथून 1338 लोक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक 1069 व्यक्ती नागपूर शहरातून या पाच महिन्यांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात 532 पुरुष आणि 537 स्त्रिया आहेत. या तुलनेत पहिल्या पाच महिन्यांत नागपूर ग्रामीण येथून 581 लोक बेपत्ता झाले.