सागरी किनारा मार्गाच्या विस्तारासाठी ३०० वृक्षांवर चालणार कुऱ्हाड

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सागर किनारी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. मात्र आता या सागरी मार्गाच्या विस्तारामुळे ३०० हून अधिक वृक्ष नष्ट होणार आहेत. सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीमधील स्थानिकांनी लावलेल्या ३०० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने झाडांवर नोटीस लावली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून स्थानिक रहिवाशांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला आहे.
सागरी किनारा मार्गाच्या वर्सोवा – दहिसर या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी कांदिवलीमधील चारकोप परिसरातील ३०० हून अधिक झाडे तोडण्यात येणार आहेत. चारकोप सेक्टर ८ मधील अनेक झाडांवर पालिकेने याबाबत नोटीस लावली आहे. ही नोटीस पाहून रहिवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही. या नोटीसांमध्ये सागरी किनारी मार्गाच्या विस्तारीकरणासाठी झाडे तोडण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच यापैकी २२८ झाडांचे पुर्नरोपण करण्यात असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, तोडण्यात येणारी झाडे गेल्या अनेक वर्षांपूर्वी लावण्यात आली आहेत. त्यामुळे ही झाडे पुर्नरोपण करणे शक्य नाही, असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत झटपट पोहोचता यावे यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे.
SL/ML/SL8 March 2025