राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ
मुंबई दि २५ : राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात येणार आहे.
यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा असा हा निर्णय घेतला.
महागाई भात्यातील ही वाढ जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार असून जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ मध्ये अदा करण्यात येईल. तसेच नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ सुमारे ५.९६ लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच ८.१२ लाख निवृत्ती
वेतनधारकांना होणार आहे.
राज्य शासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून राज्यातील सर्व घटकासोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेस ही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे.ML/ML/MS