महामुंबई मेट्रोने गाठला नवा उच्चांक : २ए आणि ७ या मार्गिकांवर दररोज ३०५ फेऱ्या

 महामुंबई मेट्रोने गाठला नवा उच्चांक : २ए आणि ७ या मार्गिकांवर दररोज ३०५ फेऱ्या

मुंबई दि १५ – मुंबईतील प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला.

८ जुलै, २०२५ रोजी महामुंबई मेट्रोने एका दिवसात ३ लाखांहून अधिक विक्रमी प्रवासीसंख्येचा आकडा गाठला. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी सख्या हे मेट्रो नेटवर्कवर प्रवाशांचा असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे.

प्रवाशांची वाढ होण्याचा सकारात्मक कल लक्षात घेत एमएमआरडीएने महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) या आपल्या कार्यान्वयन संस्थेच्या माध्यमातून २ए आणि ७ या मार्गिकांवरील दैनंदिन फेऱ्यांची संख्या २८४ वरून ३०५ इतकी वाढवत २१ अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत. या वाढीव फेऱ्यांसाठी तीन नवीन ट्रेन तैनात करण्यात आल्या असून, यामुळे एकूण कार्यरत ट्रेनची संख्या २१ वरून २४ इतकी झाली आहे.

या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गर्दीच्या वेळांमध्ये मेट्रो येण्याचा वेळ आता ६ मिनिटे ३५ सेकंदांवरून ५ मिनिटे ५० सेकंदांवर आणण्यात आला आहे. यामुळे फलाटांवरील गर्दी कमी होणार असून प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. गर्दीच्या वेळा नसताना फेऱ्यांच्या वारंवारतेमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे ९ मिनिटे ३० सेकंदांच्या अंतरानेच सुरू राहतील, जेणेकरून ऊर्जाबचत आणि संचालनात संतुलन राखता येईल.

गेल्या आठवड्यात यशस्वीपणे पार पडलेल्या प्रायोगिक चाचणीच्या आधारे फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतरच्या गर्दीच्या वेळेत या निर्णयाची परिणामकारकता स्पष्टपणे दिसून आली आहे. फेऱ्यांमध्ये वाढ हा केवळ संख्यात्मक विस्तार नसून प्रवासी सेवेच्या दर्जामधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या वाढलेल्या फेऱ्या हे एमएमएमओसीएलच्या वाढत जाण्याऱ्या प्रवासी संख्येच्या आधारित नियोजनशैलीचे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले :
“शहरातील नागरिक प्रवासासाठीच मेट्रोलाच पसंती देत आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून त्याहून एक पाऊल पुढे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. अतिरिक्त गाड्या तैनात करणे आणि वाढवलेली सेवा वारंवारता हे शहरी प्रवास अधिक जलद, कार्यक्षम आणि वाढत्या गरजांनुसार त्यात बदल करण्याच्या आमच्या उद्दिष्टांचे द्योतक आहे. कनेक्टेड, सक्षम मुंबई घडविण्याच्या आमच्या उद्दिष्टांशी हे पाऊल सुसंगत आहे.”

सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे पुढे म्हणाले :
“मुंबई मेट्रो ही शहरातील विविध स्तरातील लोकसंख्येच्या दैनंदिन आयुष्यातील एक विश्वासार्ह जीवनवाहिनी झाली आहे. जेव्हा इतर वाहतूक साधनांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हाही मेट्रोने सातत्याने सेवा सुरू ठेवून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. फेऱ्यांमध्ये करण्यात आलेली वाढ हा लोककेंद्री निर्णय आहे. सर्वांसाठी सुलभ, सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेली मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला या निर्णयातून अधिक बळकटी प्राप्त होते.”

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) म्हणाले :
“३ लाखांहून अधिक प्रवासीसंख्या पार करणे हे केवळ एक आकडेवारीच्या संदर्भातील यश नाही, तर आमच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचा आणि गेल्या काही काळात निर्माण केलेल्या विश्वासार्हतेचा ठोस पुरावा आहे. दर आठवड्याला सुमारे ५ टक्क्यांनी वाढणारी प्रवासीसंख्या पाहता, फेऱ्या वाढविण्याचा हा निर्णय म्हणजे आकडेवारीवर आधारित नियोजन, जलद अंमलबजावणी आणि प्रवासीप्रथम प्रशासन या भूमिकेचे द्योतक आहे. ‘मुंबई इन मिनिट्स’ या आमच्या व्हिजनअंतर्गत मेट्रो प्रवास हा शहरी वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, आयएएस म्हणाल्या :
“आमची प्रवासीसंख्या सातत्याने ३.०१ लाखांपर्यंत आहे, हे मेट्रो नेटवर्कच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि यशस्वी कार्यप्रणालीचे स्पष्ट निदर्शक आहे. प्रवासाच्या पॅटर्नचे काळजीपूर्वक केलेले विश्लेषण आणि गर्दीच्या वेळांमधील प्रवासीसंख्येचा सखोल अभ्यास करून २१ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मल्टी-मोडल एकत्रीकरण आणि ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’मध्ये सुधारणा यामुळेही हे यश साध्य झाले आहे. वेळेच्या बाबतीत काटेकोर, सुरक्षित आणि या भागातील सतत बदलणाऱ्या वाहतूक गरजांशी सुसंगत मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी यापुढेही कायम राहील.”

शहरातील प्रवाशांसाठी पुढचे पाऊल

हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय मुंबईच्या मेट्रो प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची सध्याची गरज आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा नियोजन यांमधील दुवा साधण्यात आला आहे. २ए आणि ७ या मार्गिकांवर आता दररोज ३०५ फेऱ्या चालविल्या जात असून, महामुंबई मेट्रोने कार्यक्षमता, सेवा वारंवारता व्यवस्थापन आणि प्रवासीकेंद्री शहरी वाहतुकीमध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. अधिक वेगाने, अधिक स्मार्टपणे आणि एकत्रितपणे मुंबईला पुढे घेऊन जाणाऱ्या दिशेने वाटचाल करण्याची एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलची बांधिलकी या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *