या प्रसिद्ध भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून २५ कोटी रु. मंजूर

अहिल्यानगर, दि, २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहिल्यानगर शहराचे भूषण असलेल्या ५२६ जुन्या भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. लवकरच हा निधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या आराखड्यातील कामे होणार आहेत.
स्वातंत्र्य चळवळीत, १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष या राष्ट्रीय नेत्यांना शहराजवळील भुईकोट किल्ल्यात बंदीवासात ठेवण्यात आले होते. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ ग्रंथ याच किल्ल्यात लिहिला. त्याची काही हस्तलिखिते आजही किल्ल्यात पाहायला मिळतात.
या भुईकोट किल्ल्याचा १.५ किमीचा परीघ, खंदक, झुलता पूल, प्रवेशद्वार ही वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासारखी आहे. लगतच जॉगिंग ट्रॅक अलीकडच्या काळात तयार करण्यात आला आहे. १५ व्या शतकाच्या अखेरीस, इसवी सन १४९० मध्ये अहमदशहाने शहराच्या स्थापनेबरोबरच जवळच किल्ल्याची उभारणी केली. त्यानंतर हा किल्ला सुलताना चांदबिबी, मुघल, पेशवे, ब्रिटिश अशा सत्तांतरात हस्तांतरीत झाला.
SL/ML/SL
23 Feb. 2025