माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर
पुणे दि ७ – पुणे जिल्ह्याच्या जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज (७ मार्च) पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले आहे.अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी दिली आहे.
मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर व शिरूर तालुक्यातील काही बिबट्यांना पकडून त्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक झाले होते. यासाठी प्रस्ताव Central Zoo Authority, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
त्यानुसार गुजरातमधील ग्रीन्स झुलॉजीकल रेस्क्यू रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर
(वनतारा),जामनगर येथील २५ सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले.
आज पहिल्या टप्प्यात १० नर आणि १० मादी अशा २० बिबट्यांना वातानुकूलित आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्रात रवाना करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नर वनविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाइल्डलाइफ SOS संस्थेच्या सहकार्याने पार पडली. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.