पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आता १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल
मुंबई, दि. ६ : पश्चिम रेल्वेने उपनगरीय मार्गावर १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवासी वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या अंतर्गत एकूण १७ लोकल सेवांचे रूपांतर करण्यात येणार आहे. त्यापैकी ९ सेवा चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत, तर ८ सेवा विरार ते डहाणू रोड मार्गावर चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, विरार-डहाणू मार्गावर प्रथमच १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असून, या गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या बदलासाठी विरार रेल्वे स्थानकावर महत्त्वपूर्ण पायाभूत सुधारणा करण्यात आल्या आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने प्लॅटफॉर्म क्रमांक ३ए आणि ४ए यांचे रुंदीकरण व विस्तार केला आहे. प्लॅटफॉर्मची रुंदी ६.५ मीटरवरून १०.५ मीटरपर्यंत वाढवण्यात आली असून, त्यामुळे प्रवाशांचा चढ-उतार अधिक सोपे होणार आहे. पश्चिमेकडील बाजूला नवीन ‘होम प्लॅटफॉर्म’ ५ए तयार करण्यात आला आहे. या सुविधांमुळे गाड्यांचे संचालन सुरळीत होईल आणि गर्दीच्या वेळी होणारी गोंधळाची परिस्थिती कमी होण्यास मदत होईल.
SL/ML/SL