पवई तलावातील १३ हजार ९२० मेट्रिक टन जलपर्णी काढली

 पवई तलावातील १३ हजार ९२० मेट्रिक टन  जलपर्णी काढली

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन प्रकल्‍प अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तलावातील जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही सुरु आहे. एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, आज (२२ मे ) पर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजे ५५ टक्के इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. दरम्यान, जलपर्णी काढताना नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची खबरदारी देखील महानगरपालिकेने घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्ष्यांची घरटी तसेच त्यांचा विणीचा हंगाम लक्षात घेता जलवाहिनी मार्ग व भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या लगतची जलपर्णी काढण्याचे काम १० जून पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे. तथापि, आदि शंकराचार्य मार्ग बाजूची जलपर्णी काढण्याची कार्यवाही अखंडपणे सुरु आहे.

पवई तलावातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरु केल्यानंतर काही निसर्ग अभ्यासक, पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक यांनी महानगरपालिका प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. त्याची तत्काळ दखल घेण्यात आली. या सुचनांचा यथायोग्य समावेश जलपर्णी काढण्याच्या कामांमध्ये करता यावा, यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी संस्‍थेचे पदाधिकारी यांनी शनिवार १८ मे रोजी पवई तलाव क्षेत्रात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, महत्‍त्‍वपूर्ण निरीक्षणांसह स्‍थळ पाहणी अहवाल बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सादर करण्यात आला.

अहवालातील निरीक्षणांनुसार, पवई तलाव येथे ज्या ठिकाणी पक्ष्‍यांचा अधिवास आहे, त्या ठिकाणी या पक्ष्‍यांचा विणीचा हंगाम साधारणपणे १० जून पर्यंत आहे. प्रामुख्याने जलवाहिनी मार्ग व भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई यांच्या बाजूस पक्ष्यांची घरटी आढळली आहेत. त्यामुळे विणीचा हंगाम संपल्यानंतर या ठिकाणची जलपर्णी काढण्‍याची कामे करावीत, अशी विनंती पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी केली आहे. ती विनंती मान्य करुन महानगरपालिकेने त्या बाजुचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवले आहे.१० जून नंतर त्या बाजूचे काम पुन्हा सुरू केले जाईल. तथापि, आदि शंकराचार्य मार्गालगतच्या बाजूस पक्ष्यांचा अधिवास आढळला नसल्याने त्या बाजूचे जलपर्णी काढण्याचे काम निरंतर सुरु ठेवण्यात आले आहे.

पवई तलाव परिसराला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी नुकतीच भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली होती. विशेषत्वाने तलावातील जलपर्णी काढण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीचा त्‍यात समावेश होता. ही कार्यवाही करताना नैसर्गिक बाबींचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी अभ्यासकांची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही केली आहे.

पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्या निरीक्षणांनुसार, सामान्यपणे दरवर्षी १० जून पर्यंतचा कालावधी हा जलचर पक्ष्‍यांचा प्रजोत्‍पादन – विणीचा हंगाम म्‍हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्‍याच्‍या कामामुळे जलचर पक्षी, मगर यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, ही प्रमुख हरकत अभ्यासकांनी नोंदविली. त्‍याची तातडीने दखल घेत बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’ या तज्ज्ञ संस्‍थेशी संपर्क साधत त्यांना प्रत्यक्ष भेट देवून वस्‍तुनिष्‍ठ अहवाल सादर करण्‍याची विनंती केली होती.

त्यानंतर, ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’चे प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांनी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अधिका-यांसमवेत पवई तलावास प्रत्‍यक्ष भेट देऊन जलवाहिनी मार्ग (हॉटेल वेस्टीन), गणेश घाट, पवारवाडी घाट आणि आय. आय. टी. मुंबई इत्यादी ठिकाणांची पाहणी केली. तसेच, याबाबतचा अहवाल बृहन्‍मुंबई महानगरपालिकेस सादर केला. पाहणी पथकात ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’च्‍या नियामक मंडळाचे सदस्‍य देबी गोयंका, उपसंचालक राहुल खोत, पक्षीनिरीक्षक तथा पवईतील रहिवासी श्रीमती मैत्रेयी, उषा नुरनी यांचा समावेश होता.

जलपर्णी काढण्याच्या कामामध्ये तलावातील जलपर्णी व इतर तरंगत्या वनस्पती काढणे व त्याची क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. तलावातील गाळ उपशाचे अथवा काठावरील झाडीझुडपे इत्यादी काढण्याच्या बाबींचा त्यात समावेश नाही, ही बाब महानगरपालिकेच्या वतीने ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’ संस्‍था सदस्‍यांच्या निदर्शनास आणून देण्‍यात आली.

जलवाहिनी मार्गाच्‍या बाजूने पवई तलावाची पाहणी करताना शेकाट्या, बगळे, कमळपक्षी, पाणकोंबडी, बदक, टिटवी, अडई पक्षांचा अधिवास असल्‍याचे निदर्शनास आले. या ठिकाणी हार्वेस्टर यंत्राद्वारे जलपर्णी काढण्‍यात येत असल्‍याने जलचर पक्ष्‍यांच्‍या विहारात व्‍यत्यय निर्माण होत असल्‍याचे लक्षात आले. तर, गणेश घाट या ठिकाणी पाहणी दरम्‍यान तलावामध्ये स्‍वच्‍छता आढळून आली. जलचर पशुपक्ष्‍यांच्‍या विहारासाठी अनुकूल मानली जाणारी स्थिती म्‍हणजे काठावर झाडीझुडपे, वनस्‍पती इत्यादी तलावाच्‍या काठावर आढळून आल्‍या.

तलावाच्‍या काठावरील झाडीझुडपे, तरंगत्‍या वनस्‍पती या जलचर पक्ष्‍यांच्‍या अधिवासासाठी, घरट्यांसाठी योग्‍य जागा आहेत. तलावाच्‍या काठावर शेकाट्या पक्ष्‍यांची घरटी असल्‍याचे स्‍थानिक पक्षीनिरीक्षकांना आढळून आले. त्‍यामुळे त्या ठिकाणी जलपर्णी काढताना घरटी सुरक्षित राहण्याच्या दृष्टिने महानगरपालिका प्रशासनाने शक्यतोवर पोकलेनऐवजी हार्वेस्टर संयंत्राचा वापर करावा, अशी विनंती अभ्यासकांकडून करण्‍यात आली आहे. त्याचा देखील प्रशासनाने सकारात्मक अंगीकार केला आहे.

दरम्यान, पक्ष्‍यांच्‍या घरट्यांना मोकाट श्‍वान, भटक्‍या जनावरांचा धोका उद्भवतो. ही बाब लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना करण्‍याची विनंती देखील बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटीने केली आहे. त्याचा देखील विचार करुन संबंधित खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वस्त करण्यात आले आहे.

पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम ८ मार्च २०२४ पासून सुरू आहे. कार्यादेशाप्रमाणे सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी,आज २२ मे २०२४ पर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजेच सुमारे ५५ टक्के इतकी जलपर्णी काढून क्षेपण भूमीवर वाहून नेण्यात आली आहे.

SW/ML/SL

22 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *