तीन राज्यांत 1247 किलोमीटरच्या रेल्वे लाईन वाढणार

नवी दिल्ली, 5— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या चार प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. १८,६५८ कोटी रुपयांच्या या चार प्रकल्पांमुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील 15 जिल्ह्यांमध्ये १२४७ किमीच्या रेल्वे लाईन वाढणार आहे.
महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये रेल्वेचा विस्तार करण्यासाठी 18 हजार 658 कोटी रूपयाच्या चार प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यात गोंदिया-बल्लारशाहसह तीन राज्यांच्या 15 जिल्ह्यांत 1247 किलोमीटरच्या रेल्वे लाईन वाढणार आहेत, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तीन राज्यांत मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश आहे. याशिवाय, संबलपूर-जरापडा आणि झारसुगुडा-ससोन दरम्यान तिसरी आणि चौथ्या लाईनचा विस्तार,
खरसिया-नया रायपूर-परमलकसा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या विस्ताराचा समावेश आहे.
वैष्णव म्हणाले की, चारही प्रकल्प मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा एक भाग आहे. एकात्मिक नियोजनामुळे हे शक्य झाले असून यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी नियमित रेल्वे सेवा उपलब्ध होईल. रेल्वे लाईनच्या विस्तारामुळे वाहतुकीला गती येईल आणि बहु-ट्रॅकिंग वाहतूकही सोयीची होईल.
यामुळे 19 नवीन रेल्वे स्थानके बांधले जाणार असून गडचिरोली आणि राजनांदगाव या दोन जिल्ह्यांतील कनेक्टिविटी वाढणार आहे. मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे जवळपास 3350 गोव आणि सुमारे ४७.२५ लाख जनता रेल्वेशी जोडले जातील, असेही त्यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये वंदे भारत, मेल आणि एक्सप्रेस आदी नवीन गाड्यांची मागणी पूर्ण होईल. यावर 8741 कोटी खर्च येणे आहे.